भरतमुनी प्रणीत दशरूपकातील नाटक हा सर्वांग परिपूर्ण असा नाट्य प्रकार आहे. नाट्यालाच भरतमुनींनी रूपक असा पारिभाषिक शब्द उपयोजिला आहे कारण यामध्ये कथानक दृश्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर केल्या जाते तसेच नाट्यातील पात्रांचा नटावर आरोप केल्या जातो, म्हणजे नट त्या पात्रांचं अन्तर्बाह्य अनुकरण करतो (सोंग घेतो) म्हणून त्याला रूपक असेही म्हणतात. रूपकाचे दहा प्रकार आहेत, ते असे –
१.नाटक, २. प्रकरण, ३. भाण, ४. व्यायोग, ५. समवकार, ६. डिम, ७. ईहामृग, ८. अङ्क, ९. वीथी, १०. प्रहसन.
वरील दहा रूपकापैकी पहिला व परिपूर्ण असा रूपक प्रकार म्हणजे नाटक. नाटकाचे कथानक आणि रस ह्या अनुशंगानी ह्यांचे विवेचन केलेले आहे.
- नाटकाची सुरुवात ही नान्दी व प्रस्तावनेनी युक्त असते. सूत्रधार हा नान्दीचे गायन करतो. ह्या नांदीत सर्व देवांना नमस्कार असो, द्विजातींचे शुभ होवो, राजा अखिल पृथ्वीवर राज्य करो, राज्याची वृद्धी होवो, रंग समृद्ध होवो, प्रेक्षकांचा धर्म वृद्धींगत होवो, नाटककाराच्या यशात भर पडो अशाप्रकारच्या अनेक प्रार्थना असतात. प्रस्तावनेतून नाटकाचे नाव, त्याचे रचयिता आणि त्याची कथावस्तु वेगवेगळ्या प्रकारे सूचित केल्या जाते. प्रस्तावना ही पाच प्रकारची असते.
- रस – नाटकांत श्रृंगार किंवा वीर हा प्रधान रस असावा. अन्य बाकी सर्व रस त्याला उपकृत करणारे असावेत आणि निर्वहण सन्धिमध्ये अद्भुत रसाची योजना करावी असा नाट्यशास्त्राचा संकेत आहे. त्याचनुसार नाटक हे नेहमी सुखान्त असावे.
- नाटकाची कथावस्तु – नाटकाचे कथानक यालाच इतिवृत्त असेही म्हटले आहे. नाटकाच्या कथानकाचे विविध दृष्टीकोनातून विवेचन केलेले आहे.
- कथानक हे प्रसिद्ध किंवा मिश्र स्वरूपाचे असावे.
- फलाच्या दृष्टीनी कथावस्तु दोन प्रकारची होते. आधिकारिक आणि प्रासंगिक. कथानकाच्या नायकाला फलप्राप्ती करून देणारे मुख्य आधिकारिक आणि त्याला उपकृत करणारे, पोषक ठरणारे असे प्रासंगिक कथानक असते.
- कथानकाच्या सादरीकरणाच्या दृष्टीने त्याचे दृश्य आणि सूच्य असे दोन भाग पडतात. त्यातील दृश्य भाग हा अंकांच्याद्वारे रंगमंचावर दाखविला जातो आणि सूच्य भाग हा अर्थोपक्षेपकांच्याद्वारे दाखविला जातो.
दृश भाग – दृश्य भागामध्ये नाटक हे अंकांनी युक्त असावे. नाटकामध्ये कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा अंक अशी अंकांची संख्या असावी. अंकाच्या स्वरूपाची चर्चा करताना भरतमुनींनी त्यात कोणत्या गोष्टी दाखवाव्या आणि कोणत्या दाखवू नयेत याचा निर्देश केलेला आहे. क्रोध, प्रसाद, शोक, शापाची समाप्ती, गडबड, विवाह, अद्भुताचा संभव व त्याचे दर्शन ह्या गोष्टी अंकामध्ये प्रत्यक्ष दाखवाव्यात. तर युद्ध, राज्यापासून पदच्युती, मृत्यु, तसेच नगराला पडलेला वेढा या गोष्टी अंकात दाखवू नयेत. जो अभ्युदययुक्त प्रख्यात नायक असेल त्याचा वध झालेला अंकात किंवा प्रवेशातही दाखवू नये. नायकावरील मोठे संकट दाखवायचे झाल्यास त्याने राज्यातून पलायन केलेले किंवा अधिकाधिक बंदिवास झालेला दाखवावा. नाटकाच्या प्रत्येक अंकामध्ये नायक उपस्थित असावा. एका अंकातील वृत्त एकाच दिवसात समाप्त होणारे असावे आणि दोन अंकांमध्ये व्यतीत होणारा काल एका वर्षाहून अधिक असू नये. अंकाच्या शेवटी रंगमंचावरील सर्व पात्रांनी प्रस्थान करावे. तसेच अंकामध्ये प्रमुख रसाचा परिपोष सातत्याने केला जावा. अश्याप्रकारे नाटकात अंकांची योजना असावी.
सूच्यभाग – सूच्यभागामध्ये रंगमंचावर प्रत्यक्षपणे दाखविण्यास अनावश्यक किंवा अनुचित परंतु कथानकाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असा भाग वा घटना केवळ सूचित केल्या जातात आणि त्याद्वारे कथेचे अखण्डित्व जपले जाते, अश्या घटनांना सूच्य वा अर्थोपक्षेपक म्हटले जाते. ते पाच प्रकारचे आहे. १. प्रवेशक, २. विष्कम्भक, ३. चूलिका, ४. अंकास्य, ५. अंकावतार. नाटकामध्ये प्रवेशकाची व विष्कम्भकाची योजना असते. प्रवेशक हे अधम पात्रांनी म्हणजे दास, चेटी इत्यादिंनी युक्त असते आणि ते प्राकृत भाषा बोलणारे असते. विष्कम्भक हे दोन प्रकारचे असते. शुद्ध विष्कम्भक आणि संकीर्ण विष्कम्भक. शुद्ध विष्कम्भक हे केवळ मध्यम पात्रांनी म्हणजे अमात्य, सेनापति इत्यादिंनी युक्त असते तर संकीर्ण विष्कम्भक हे मध्यम आणि अधम पात्रांनी युक्त असते. अश्याप्रकारे विष्कम्भक हे संस्कृत आणि प्राकृत भाषा बोलणारे असते.
- नाटकाचे कथानक हे पाच अवस्था, पाच अर्थप्रकृती आणि पाच सन्धि ह्यांनी युक्त असावे. सन्धि म्हणजे जोडणे. सन्धि ह्या पात्रांच्या संवादाच्या माध्यमातून कथानकातील घटना जोडत जोडत कथानकाचा विकास केला जातो.
- नाटकाच्या पात्रांचा विचार करता नाटकाचा नायक हा प्रख्यात वंशातील राजा किंवा राजर्षी, धीरोदात्त किंवा धीरललित असावा. नाटकात चार-पाच प्रधान पात्रे नायकाच्या कार्याशी संलग्न असावीत. नाटकांत अमात्य, पुरोहित, सेनापति इत्यादी पात्रांची योजना असावी. नाटकाची नायिका उच्चकुलोत्पन्न युवति असावी. याव्यतिरिक्त अन्तःपुरातील काही पात्र जसे नायिकेच्या सख्या, विदूषक, चेटी, कंचुकी इत्यादिंची पण योजना असावी.
- नाटक हे चारही वृत्तींनी युक्त असावे.
- भाषा व संवाद – नाटकामध्ये राजा, अमात्य हे संस्कृत बोलतात तर नायिका व इतर पात्रांची भाषा प्राकृत असते. नाटकाचे संवाद हे विविध प्रकारचे आहे. त्यात प्रमुख म्हणजे स्वगत, प्रकाशक, जनान्तिक, अपवारित अश्या स्वरूपात असतात.
- नाटकाचा शेवट हा आशिर्वादयुक्त अश्या भरतवाक्यानी होतो. ज्यामध्ये सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना केलेली असते.
अश्याप्रकारे नाटकाची ही तान्त्रिक बाजू सर्व अभिजात संस्कृत नाटकांमध्ये बघायला मिळते आणि टीकाकारांनी याचा आणखी उहापोह केलेला आहे. नाटकाचे उदाहरणरूपात अभिज्ञानशाकुन्तलम् ह्या नाटकाचे कथानक प्रख्यात आहे कारण ह्या नाटकाची कथा प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रन्थ असलेल्या महाभारतातून घेतली आहे. त्यामुळे इतिहास प्रसिद्ध असल्यामुळे ह्या नाटकाचे कथानक प्रख्यात आहे. अभिज्ञानशाकुन्तलम् हे नाटक सात अंकांनी युक्त आहे. ह्याचा प्रधान रस श्रृंगार रस आहे. नाटकाचा नायक दुष्यन्त हा पुरुवंशी क्षत्रिय राजा असून तो धीरोदात्त नायक आहे. वीरता, गम्भीरता, क्षमा, स्थिरता, गर्वराहित्य इत्यादि सर्वगुण त्याच्यामध्ये विद्यमान आहेत. ह्या नाटक विष्कम्भक आणि प्रवेशक ह्यांनी युक्त आहे. नाटकाच्या तिसऱ्या अंकाची सुरुवात विष्कम्भकानी आहे. आणि सहाव्या अंकात प्रवेशक आहे. नाटकाच्या कथानकाचा विकास हा पाच सन्धिंनी झालेला आहे. जसे –
- नाटकाच्या पहिल्या अंकापासून दुसऱ्या अंकाच्या “विश्रामं लभतामिदं च शिथिलज्याबन्धमस्मद्धनुः” ह्या दुष्यन्ताच्या संवादा पर्यंत मुखसन्धि आहे.
- मग तिसऱ्या अंकाच्या शेवटपर्यन्त प्रतिमुखसन्धि आहे.
- चौथ्या अंकाच्या सुरुवातीपासून पाचव्या अंकात गौतमी शकुन्तलाचे अवगुण्ठन दूर करते आणि दुष्यन्तद्वारा शकुन्तलाच्या प्रत्याख्यान पर्यंत गर्भसन्धि आहे.
- पाचव्या अंकाचा अवशिष्ट अंश आणि संपूर्ण सहावा अंक विमर्शसन्धि आहे.
- सातव्या अंकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यन्त निर्वहण सन्धि आहे.
नाटकाचा शेवट भरतवाक्यानी झालेला आहे आणि समस्त लोकांच्या कल्याणाचा उच्चार केलेला आहे. अश्याप्रकारे अभिज्ञानशाकुन्तलम् हे नाटकाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याच प्रमाणे अन्य काही प्रमुख नाटके जसे उत्तररामचरितम्, वेणीसंहार, मुद्राराक्षसम् इत्यादि. हे एक लोकवृत्तानुकरण असल्यामुळे त्या त्या काळाच्या गरजेनुसार आवश्यक तो बदल करण्याची सवलत भरतमुनींनी दिलेली आहे त्यामुळे काळानुरूप विविध नाटकांमधील बदल आपल्या दृष्टीस येतात.
संदर्भ:
1. प्रा.र.पं.कंगले, दशरूपक विधान, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, सचिवालय, मुंबई, 1974
2. डॉ.भोला शंकर व्यास, दशरूपक, चौखम्बा विद्या भवन, बनारस, 1984
3. राधावल्लभ त्रिपाठी, नाट्यशास्त्रविश्वकोश, प्रतिभा प्रकाशन, दिल्ली, 1999
4. डॉ. पारसनाथद्विवेदी, नाट्यशास्त्रम्, संपूर्णानन्दसंस्कृतविश्वविद्यालय, वाराणसी (प्रथमोभागः)1992, (द्वितीयोभागः) 1996
5. डॉ.सुरेन्द्रदेव शास्त्री, अभिज्ञानशाकुन्तलम्, रामनारायणलाल बेनीप्रसाद,इलाहाबाद. 1974
6. गोविन्द केशव भट, संस्कृत नाटके आणि नाटककार, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, 1980
Comments